जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम त्यांना तात्काळ मिळावी, आदि मुद्दे घेवून शेतकरी नेते खा.बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी गेल

जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम त्यांना तात्काळ मिळावी, आदि मुद्दे घेवून शेतकरी नेते खा.बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी खा.बजरंग सोनवणे यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून आतापर्यंत सुरू असलेल्या पाठपुराव्याचे कागद दाखवून आपण शेतकरीपुत्र असल्याचे दाखवून दिले. यावेळी त्यांनी आपण केलेल्या मागण्या संसदेत मांडूच पण मुख्यमंत्र्यांकडे बैठकीसाठी वेळ घेवून आपली त्यांची भेट घडवून देवू आणि तिथेही हा प्रश्न मांडू असा शब्द दिला.
बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काच्या खरीप हंगाम 2025 मधील पिकविम्याची रक्कम त्यांना तात्काळ मिळावी, यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे नेतेभाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दि.1 जून रोजी खा.बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी पोहचले. यावेळी शेतकरी नेत्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत एक निवेदन खा.सोनवणे यांना दिले. यावेळी खा.सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच आपण सर्वांनी मला संसदेत पाठविले असून आजवर आपण शेतकर्यांचे प्रश्न मांडत आलेलो आहोत. पिकविम्याच्या प्रश्नावर आपण संसदेत आवाज उठवित आहोतच. दरम्यान, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे बैठक घेणे आवश्यक आहे. या बैठकीची वेळ घेवून आपल्यातील शेतकरी प्रतिनिधींना या बैठकीत बोलावू, तुम्ही घेवून आलेले प्रश्न आपण सोडविण्यासाठी पाठपुरावा करतच आहोत, असे सांगतांना त्यांनी आजवर केलेला पत्रव्यवहार देखील दाखवला. यामुळे प्रश्न घेवून आलेले शेतकरी नेत्यांनी त्यांच्या पाठपुराव्याचे स्वागत केले. दरम्यान, खा.सोनवणे यांनी शेतकरी संघर्ष समितीला पत्र दिले असून पत्रात म्हटले आहे, बीड जिल्ह्यातील बळीराजाच्या हिताचा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत माझी भूमिका पूर्णपणे सकारात्मक आहे. जोपर्यंत जिल्ह्यातील शेवटच्या शेतकर्याला त्याचा हक्काचा पिकविमा मिळत नाही, तोपर्यंत माझा शासन स्तरावरील लढा आणि आवश्यक तो पाठपुरावा पुढेही अविरत सुरू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाई थावरेंकडून भुमीकेचे स्वागत
खा.सोनवणे यांच्या या तत्पर आणि आक्रमक भूमिकेमुळे बीड जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनीही खासदारांच्या या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले असून, लोकप्रतिनिधींनी स्वत: या विषयात लक्ष घातल्यामुळे पिकविमा मिळण्याच्या प्रक्रियेला गती येईल, असा विश्वास व्यक्त केला.

COMMENTS