पुणे / ठाणे: राज्यात खराब रस्त्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच असून नाशिक आणि ठाण्यानंतर आता पुण्यातही खड्ड्यांनी व खराब रस्त्याने एका महिलेचा बळी घ

पुणे / ठाणे: राज्यात खराब रस्त्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच असून नाशिक आणि ठाण्यानंतर आता पुण्यातही खड्ड्यांनी व खराब रस्त्याने एका महिलेचा बळी घेतला आहे. चाकण एमआयडीसी परिसरातील सिमेंटच्या रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरल्याने ४२ वर्षीय सानवी पांचाळ यांचा अवजड वाहनाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून चाकण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मृत सानवी पांचाळ या भोसरीतील इंद्रायणीनगर येथील रहिवासी असून स्कोडा कंपनीत सिक्युरिटी म्हणून कार्यरत होत्या. ड्युटी संपवून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घरी परतत असताना, पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा तोल गेला. त्या खाली पडताच मागून आलेल्या अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चाकणमधील रस्त्यांच्या भीषण दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर मृत्यूचे सापळे कायम
दुसरीकडे, मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे टीडीआरएफ (TDRF) व ठाणे महापालिकेचे अग्निशामक जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाल्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. पडघा जवळील कोशिंबी गाव परिसरात महामार्गावर ६ फूट रुंद आणि २ फूट खोल खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे चुकवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून अनेक वाहने विरुद्ध दिशेने धावत आहेत. एका जवानाचा बळी जाऊनही खड्डे बुजवले न गेल्याने प्रशासनाच्या शून्य कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS