केज: टाकळी येथील विलास घुले यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. या प्रकरणात राजकीय द्वेषातून माझ्यावर खोटे आरोप कर

केज: टाकळी येथील विलास घुले यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. या प्रकरणात राजकीय द्वेषातून माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया सौरभ सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी मी दुपारपर्यंत येडेश्वरी साखर कारखान्यावर आणि दुपारनंतर घरीच होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
विलास घुले हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर सौरभ सोनवणे यांनी प्रथमच माध्यमांसमोर येत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, “विलास घुले यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची घटना असून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, घटनेच्या दिवशी मी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत येडेश्वरी साखर कारखान्यावर होतो आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मी घरीच होतो. या गुन्ह्यात माझी ‘थार’ गाडी वापरल्याचा खोटा आरोप केला जात आहे, परंतु माझी गाडी घराजवळच उभी होती. पोलिसांनी माझ्या घरचे दिवसभरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज नेले असून त्यात माझी गाडी घराजवळच असल्याचे स्पष्ट दिसत आहे.”
हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा सोनवणे यांनी केला. “मी खासदारांच्या माध्यमातून जिल्हाभर फिरत असतो, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतो. लोकांना आमचे काम आवडते, हेच काहींना खटकत असल्यामुळे माझे नाव या प्रकरणात गोवले जात आहे,” असा संशय त्यांनी व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी सांगितले की, “सत्य समोर आले पाहिजे आणि मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी माझे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासले असून त्यातूनही वस्तुस्थिती स्पष्ट होईल. पोलीस प्रशासन सत्य जनतेसमोर आणेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

COMMENTS