मुंबई : राज्यातील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा उपक्रम

मुंबई : राज्यातील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. यंदापासून खरीप पिकांच्या बियाण्यांचे वितरण महाडीबीटी संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार असून पात्र शेतकर्यांनी विलंब न करता अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
राज्यात खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत विविध पिकांच्या गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांसाठी आवश्यक बियाण्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यभरातील शेतकर्यांसाठी सुमारे तीन लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये सोयाबीनची 66 हजार 750 क्विंटल तर भुईमूगाची 35 हजार 500 क्विंटल बियाणे उपलब्ध असून इतर खरीप पिकांची बियाणेदेखील संकेतस्थळावरून मिळणार आहेत. यासोबतच शेतकर्यांना आधुनिक शेती पद्धतींची माहिती आणि सुधारित तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी राज्यभरात दोन लाखांहून अधिक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रात्यक्षिकांमधून सुधारित वाण, आधुनिक लागवड तंत्र, उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना आणि गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, बियाणे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि गती आणण्यासाठी महाडीबीटीच्या माध्यमातून ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांना वेळेत दर्जेदार बियाणे मिळण्यास मदत होणार असून कोणत्याही प्रकारची गैरसोय टळणार आहे. खरीप हंगामाची तयारी लक्षात घेता शेतकर्यांनी त्वरित अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS