शेवगाव : शहरातील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले असले तरी वाहतूक कोंडीची समस्या अद्याप कायम आहे. विशेषतः शहरातील अरुंद गल्ल्या व बोळांमधू

शेवगाव : शहरातील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले असले तरी वाहतूक कोंडीची समस्या अद्याप कायम आहे. विशेषतः शहरातील अरुंद गल्ल्या व बोळांमधून वाळू वाहतूक करणारे डंपर व अवजड वाहने बिनधास्तपणे धावत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.शहरातील मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यांवर दिवसभर दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत अवजड डंपर अरुंद रस्त्यांमध्ये शिरल्याने वाहतूक ठप्प होत असून अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. डंपर चालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. काही चालकांच्या मुजोर वर्तनामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासनाने अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले असले तरी वाहतूक व्यवस्थापनाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याने कोंडीची समस्या जैसे थे आहे. शहरातील गर्दीच्या भागातून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणावेत, तसेच वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असून याकडे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

COMMENTS