मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त

मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चांना वेग आला आहे. या जागेसाठी ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांनी स्वतःहून राज्यसभेची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून मोठी जबाबदारी सांभाळत असल्याने राज्यसभेसाठी आग्रह धरणे योग्य ठरणार नाही. या विषयावर पक्षात अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसून अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध पातळ्यांवर हालचाली सुरू झाल्या आहेत. रिक्त जागेसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आल्याने पक्षांतर्गत स्पर्धा वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यसभेच्या जागेबरोबरच संघटनात्मक बदलांवरही लवकर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची निवड हेही पक्षासमोरचे महत्त्वाचे आव्हान मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात समीर भुजबळ यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद अद्याप रिक्त आहे. त्यामुळे राज्यसभा आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष या दोन्ही नियुक्त्यांवर पक्ष नेतृत्व एकाच वेळी निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन पाटील हे तीन सदस्य कायम आहेत. आता रिक्त जागेसाठी नेतृत्व कोणावर विश्वास ठेवणार, तसेच पक्ष संघटनेत कोणते बदल होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

COMMENTS