अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू आहे. सद्यस्थितीत वडवणीपर्यंतचे रेल्वेचे काम पुर्ण झालेले असून आता आष्टी ते बीडपर्यंतचे रेल्वे

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू आहे. सद्यस्थितीत वडवणीपर्यंतचे रेल्वेचे काम पुर्ण झालेले असून आता आष्टी ते बीडपर्यंतचे रेल्वे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण झाले आहे. यामुळे बीड-पुणे-मुंबई रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून दि.17 सप्टेंबरपासून बीड-पुणे-मुंबई रेल्वे सुरू होईल, अशी माहिती खा.बजरंग सोनवणे यांनी दिली.
दि.30 जून रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील रेल्वे, महावितरण विभागाची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची उपस्थिती होती. यावेळी रेल्वे विभागाच्या बैठकीत खा.बजरंग सोनवणे यांनी आष्टी ते परळी रेल्वे मार्गाचा आढावा घेतला.अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गातील विद्यूत जोडणी, रेल्वे रूळ अंथरणे, भुसंपादन अशा विविध विषयाचा आढावा घेतला.बीड ते परळी मार्गात काही ठिकाणी भुसंपादचे विषय असून त्याठिकाणच्या शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, काही ठिकाणी विनाकारण कोणी रेल्वे कामात अडथळा आणत असेल तर त्याठिकाणी पोलीस बंदोबस्तात काम करावे, अशा सुचना दिल्या. दरम्यान, रेल्वे अधिकार्यांनी दोन महिन्यात बीड ते परळी पर्यंतचे काम पुर्ण केले जाईल, असे सांगितले. तर बीड ते आष्टीपर्यंतचे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण झाले असून त्याठिकाणी आता बीड-पुणे-मुंबई रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पुण्यात एक ठिकाणी किरकोळ काम बाकी असून ते पंधरा दिवसात पुर्ण होईल, यानंतर बीडहून पहाटे 5 वाजता पुण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात येईल, तर पुण्याहून सायंकाळी पाच वाजता बीडला रेल्वे येईल, याच पध्दतीने बीड-मुंबई रेल्वे देखील सुरू करण्यात येणार असून तीची वेळही दोन दिवसात ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याच बरोबर प्रलंबित धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित रेल्वे मार्गांबाबत प्रशासकीय बाबी आणि पुढील कायदेशीर व तांत्रिक कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली. बीड येथील बार्शी नाका परिसरातील रेल्वेस्थानकाबाबत आपण रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करत असून तो प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वासही खा.बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. बीड जिल्ह्यात शेतकर्यांना विद्यूत पुरवठा सुरळीत होत नसल्याची ओरड वाढत असून महावितरण कंपनीने जिल्ह्यात नव्याने रोहित्र, जनीत्र बसविण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत, या कामात काही अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेल, असा शब्दही खा.बजरंग सोनवणे यांनी दिला. सकाळी 11 वाजता खा.बजरंग सोनवणे हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठकीसाठी आले होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत बैठका सुरू होत्या. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने खा.बजरंग सोनवणे यांनी सलग सहा तास बैठका घेण्याचा एक रेकॉर्डच तयार केला आहे.

COMMENTS