मुंबई : राज्यात पावसाने हाहाकार उडवला असतांना दुसरीकडे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोब
मुंबई : राज्यात पावसाने हाहाकार उडवला असतांना दुसरीकडे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त होत आहे.
साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ एका खासगी कंत्राटदाराकडून देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामासाठी रस्त्यावरील 25 फूट खोल मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते, मात्र आजूबाजूला कोणतेही सुरक्षेचे बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते. भरपावसात मोबाइलवर बोलत चाललेले साकीनाका येथील यादव नगरचे रहिवासी असलेले 60 वर्षीय अस्लम इसाक शेख यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते थेट 20 ते 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडले. यानंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व शोध आणि बचाव कार्याला सुरुवात झाली. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, राज्यात नैऋत्य मोसमी पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच कोकणातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. मुंबईतील हिंदमाता, चेंबूरमधील सुभाषनगर तसेच इतर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ एक मोठे झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झाड हटविण्याचे काम पूर्ण केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. सततच्या पावसामुळे दादर रेल्वे स्थानक परिसरातील रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे उपनगरी रेल्वे सेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
मुंबईत 24 तासांमध्ये 172 मिमी पावसाची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासांत 172 मिमी पावसाची नोंद झाली असून समुद्रात भरतीच्या वेळी सुमारे पंधरा फूट उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारे आणि किनारी भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रायगडमधील सर्वाधिक प्रभावित सात तालुक्यांतील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे पालघर, पुणे आणि घाटमाथा परिसरासाठी अतिधोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.

COMMENTS