ज्या विभागाचा कारभार सुधारण्याचे नाव घेत नाही, तिथे ’स्मार्ट’ तंत्रज्ञान कशासाठी? असा संतप्त सवाल सध्या गोकुंद्यातील नागरिक विचारत आहेत. एकीकडे

ज्या विभागाचा कारभार सुधारण्याचे नाव घेत नाही, तिथे ’स्मार्ट’ तंत्रज्ञान कशासाठी? असा संतप्त सवाल सध्या गोकुंद्यातील नागरिक विचारत आहेत. एकीकडे उन्हाळ्याच्या कडाक्यात वीजपुरवठा बेभरवशाचा झाला असताना, दुसरीकडे महावितरण आता ग्राहकांच्या माथी जबरदस्तीने ’स्मार्ट मीटर’ मारले आहे. मात्र, या स्मार्ट कारभारात अधिकार्यांचा ’माज’ आणि कर्मचार्यांची ’मुजोरी’ मात्र सर्रास पाहायला मिळत आहे.
गोकुंद्यात सध्या महावितरणच्या अधिकार्यांनी एक नवीनच फंडा शोधून काढला आहे. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घ्यायची वेळ आली की साहेबांचे फोन ’बिझी’ लागतात किंवा ते ’नॉट रिचेबल’ होतात. कार्यालयातील कर्मचार्यांना वीज गुल झाल्याबद्दल विचारणा केली, तर जणू काही ते ग्राहकांवर उपकारच करत आहेत अशा आविर्भावात उद्दट उत्तरे दिली जातात. वीज कधी येईल माहीत नाही, आमचं काम आम्ही करतोय, अशा भाषेत ग्राहकांना अपमानित करण्याचे प्रकार वाढले आहेत. जुन्या मीटरमध्ये काही बिघाड नसतानाही, नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा अट्टहास महावितरण का करत आहे?विजेचा पत्ता नाही, पण मीटर मात्र हायटेक?, तक्रारीसाठी फोन केला तर कर्मचारी फोन बंद करून का बसतात?, जनतेच्या पैशावर पगार घेणार्या कर्मचार्यांना ’सौजन्य’ म्हणजे काय हे ठाऊक नाही का? विजेचा लपंडाव सुरू असतानाच आता स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचे नियोजन सुरू आहे. जेव्हा एखादा नागरिक आपली समस्या मांडण्यासाठी कार्यालयात जातो, तेव्हा त्याला सहकार्य करण्याऐवजी उलट उत्तरे देऊन पिटाळून लावले जाते. बिल भरायला आम्ही ’स्मार्ट’, पण सेवा द्यायला तुम्ही ’ढ’ का? असा रोकठोक सवाल आता जनता विचारत आहे. क्षेत्रीय कर्मचारी तर अनेकदा आपले अधिकृत फोन बंद करून गायब होतात. जेव्हा रात्रीच्या वेळी वीज जाते आणि नागरिक मदतीसाठी फोन करतात, तेव्हा समोरून येणारा ’स्विच ऑफ’चा आवाज त्यांच्या संतापात तेल ओतण्याचे काम करत आहे. जर महावितरणने ही उद्धटपणाची भाषा सुधारली नाही आणि जबरदस्तीने मीटर लादण्याचे प्रकार थांबवले नाहीत, तर संतप्त जनता महावितरणच्या कार्यालयासमोरच ’ठिय्या’ मांडणार आहे. फोन उचलण्याचे कष्ट न घेणार्या अधिकार्यांना आता जनतेच्या प्रश्नांना समोरासमोर उत्तर द्यावे लागेल. महावितरणच्या या गलथान आणि उद्दट कारभारामुळे गोकुंद्यात कधीही जनआंदोलनाचा भडका उडू शकतो, अशी चिन्हे दिसत आहेत.

COMMENTS