नांदेड : उन्हाळी हंगामात शेतकर्यांच्या पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी उर्ध्व

नांदेड : उन्हाळी हंगामात शेतकर्यांच्या पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी उर्ध्व मानार प्रकल्पांतर्गत लिंबोटी धरणातून आजपासून शेवटच्या पाणीपाळीला सुरुवात करण्यात आली आहे. ही पाणीपाळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुरू झाल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयामार्फत देण्यात आली.
लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील सिंचन व्यवस्था सक्षम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लिंबोटी धरणाचा मोठा लाभ परिसरातील शेतकर्यांना होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी पिकांसाठी धरणातून पाणी सोडण्यात येत असून, यावर्षीचे हे दुसरे आणि अंतिम आवर्तन असणार आहे. 6 मे ते 16 मे या कालावधीत ही पाणीपाळी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. शेतकर्यांनी नियोजनपूर्वक पाण्याचा वापर करून आपल्या पिकांचे संवर्धन करावे, तसेच पशु-प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचीही योग्य व्यवस्था करावी, असे आवाहन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे. संबंधित विभागानेही पाणी वितरण प्रक्रियेत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या असून, पाणी वाया जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पाणीपाळीमुळे परिसरातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार असून, उन्हाळी पिकांना जीवनदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS