भोकर : तालुक्यातील शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफीचा लाभ अद्याप प्रत्यक्षात मिळालेला नसल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर प्रचंड

भोकर : तालुक्यातील शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफीचा लाभ अद्याप प्रत्यक्षात मिळालेला नसल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेली बी-बियाणे, खते आणि औषधे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडे धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
यावर्षी बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. खतांच्या प्रत्येक पोत्यामागे सुमारे ३०० ते ६०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यातच भर म्हणून युरिया खताचा पुरवठा सुरळीत नसल्याने अनेक ठिकाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे की, सरकारची ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जर एप्रिल किंवा मे महिन्यातच राबविण्यात आली असती, तर नवीन पीक कर्ज मंजुरीची प्रक्रिया जूनपूर्वी पूर्ण झाली असती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात वेळेवर पैसा उपलब्ध होऊन त्यांना खाजगी सावकारांच्या दारात जाण्याची वेळ आली नसती. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भोकर तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

COMMENTS