नांदेड : सुदृढ, निरोगी आणि तंदुरुस्त भारत घडविण्याच्या उद्देशाने बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजता श्रीराम सेतू, गोवर्धनघाट येथे २७ व्या
नांदेड : सुदृढ, निरोगी आणि तंदुरुस्त भारत घडविण्याच्या उद्देशाने बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजता श्रीराम सेतू, गोवर्धनघाट येथे २७ व्या भव्य चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील ११ वेगवेगळ्या गटांमधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना स्नेहलता जायस्वाल यांच्या वतीने आकर्षक मोबाईल बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच पहिल्या २०० स्पर्धकांना आकर्षक टी-शर्टचे मोफत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
भाजप महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्यदायी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि नियमित व्यायामाची सवय रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या यंदाच्या २७ व्या वर्षातील स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यंदाची अमरनाथ यात्रा ३ जुलै व १७ जुलै रोजी नांदेडहून रवाना होणार असल्याने, यात्रेकरूंच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीनेही या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली असून प्रत्येक स्पर्धकाला २ किलोमीटरचे अंतर पूर्ण करावे लागणार आहे. पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, अमरनाथ यात्रेकरू आणि माध्यम प्रतिनिधी अशा एकूण ११ गटांमध्ये ही स्पर्धा होईल. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना स्मृतिचिन्हे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसाठीची नावनोंदणी २४ जून रोजी सकाळी ५:४५ वाजल्यापासून थेट स्पर्धास्थळी सुरू होईल.

COMMENTS