गेवराई तालुक्यातील ब्रम्हगाव येथे जागृत देवस्थान मारुतीरायाची विटंबना व गोहत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच दुग्धाभिषेक करणार्या

गेवराई तालुक्यातील ब्रम्हगाव येथे जागृत देवस्थान मारुतीरायाची विटंबना व गोहत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच दुग्धाभिषेक करणार्या निरपराध हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय रामराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष भिमाशंकर यादव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. यासाठी भाजप नेत्या, नगरसेविका डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांनी यशस्वी मध्यस्थी केली.
दि.11 जूनपासून सुरू असलेल्या या उपोषणामध्ये ब्रम्हगाव प्रकरणातील आरोपींवर मकोका लावणे, गोहत्याप्रकरणी महाराष्ट्र गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये कठोर कारवाई करणे, धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करणे, आरोपींवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धता व तडीपारीची कारवाई करणे, गावात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवणे, हिंदू तरुणांवरील कथित खोटे गुन्हे मागे घेणे, मुख्य सूत्रधारांवर कारवाई करणे, उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करणे आणि गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान, भाजप नेत्या तथा बीड नगरपरिषदेच्या नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ आणि जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांची भेट घेतली. या बैठकीत उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या पोलिस प्रशासनासमोर मांडल्या. संबंधित मागण्यांबाबत कायदेशीर चौकटीत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भाजपचे नगरसेवक, सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आंदोलन तात्पुरते स्थगित
पोलीस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सदरील आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे अखिल भारतीय रामराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष भिमाशंकर यादव पाटील यांनी म्हटले आहे.

COMMENTS