बीड: नगरनाका चौक परिसरातील नाल्याच्या कडेला उपजीविकेसाठी फळविक्री करणार्या छोट्या व्यावसायिकांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली.

बीड: नगरनाका चौक परिसरातील नाल्याच्या कडेला उपजीविकेसाठी फळविक्री करणार्या छोट्या व्यावसायिकांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान अनेक फळविक्रेत्यांच्या फळांची नासधूस झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, शहरातील काही प्रमुख ठिकाणी सुरू असलेल्या अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेख फारुख यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गरीब आणि रोजंदारीवर उदरनिर्वाह करणार्या फळविक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाते, मात्र मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. शेख फारुख म्हणाले की, अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना प्रशासनाने सर्वांना समान न्याय देणे आवश्यक आहे. गरीब विक्रेत्यांच्या मालाची नासधूस करून त्यांच्यावर अन्याय करणे योग्य नाही. शहरातील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर एकसमान निकषांनुसार कारवाई झाली पाहिजे. अन्यथा प्रशासनाची भूमिका पक्षपाती असल्याचा संदेश जनतेमध्ये जाईल. राजीव गांधी चौकातील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन सर्व अतिक्रमणधारकांवर समान पद्धतीने कारवाई करावी, अशी मागणी शेख फारुख यांनी केली आहे.

COMMENTS