कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या विक्रमी मतदानानंतर राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांना वेग

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या विक्रमी मतदानानंतर राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना या उच्च मतदानाला बदलाची चाहूल असे संबोधत भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या विजयाचा दावा केला.
ते म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील मतदानाने जनतेचा कल स्पष्ट केला असून मतदारांनी परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे. राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने मतदान करून जुन्या विक्रमांना मागे टाकले असून याचा फायदा भाजपला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यातील 152 जागांपैकी 110 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचा दावा त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी बाहेरचे लोक राज्य करतील अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्याचा पुढील मुख्यमंत्री हा बंगालमध्ये जन्मलेला, बंगाली माध्यमातून शिक्षण घेतलेला आणि बंगाली भाषा बोलणारा असेल. तो मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा नसून भाजपचा कार्यकर्ता असेल, असे विधान करत त्यांनी घराणेशाहीवर अप्रत्यक्ष टीका केली. निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदाचे मतदान अधिक शांततेत पार पडल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, 2016, 2021, 2023 आणि 2024 मधील विविध निवडणुकांमध्ये जखमींची संख्या लक्षणीयरीत्या जास्त होती, तर यावेळी पहिल्या टप्प्यात 30 पेक्षा कमी लोक जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

COMMENTS