विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Homeताज्या बातम्यासंपादकीय

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

जगभरात कोरोना नावाच्या विषाणूने गेल्या दोन वर्षांपासून खळबळ घातली असतांनाच, भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरत, रुग्णांची संख्या कमी झाली होती. मा

केरळ उत्तम उदाहरण
केंद्राविरुद्ध दिल्ली संघर्ष पेटणार
अवकाळीचा तडाखा

जगभरात कोरोना नावाच्या विषाणूने गेल्या दोन वर्षांपासून खळबळ घातली असतांनाच, भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरत, रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांत ओमायक्रॉन या विषाणूमुळे रुग्ण वाढीची संख्या वाढली आहे. अशाच परिस्थितीत महाराष्ट्रात 15 डिसेंबरनंतर शाळा पूर्ण तयारीने सुरू करण्यात आल्या. मात्र शाळांमध्ये मोठया प्रमाणावर विद्यार्थी कोरोनाबाधित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील घनसोली येथील शाळेत 16 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर देखील प्रशासन आणि राज्य सरकारने पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथे सुरूवातीला काही विद्यार्थी आणि शिक्षक असे 19 जण कोरोनाबाधित निघाले, त्यानंतर रविवारी पुन्हा 52 असे एकूण 71 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर पुण्यात एमआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात देखील 13 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. राज्यात 15 डिसेंबरपासून सर्व शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. पूर्ण क्षमतेने वर्ग भरवण्यात येत असले तरी, प्रत्येक शाळा महाविद्यालयात पुरेशा जागेअभावी विद्यार्थ्यांमध्ये डिस्टन्स ठेवता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर अनेक निवासी शाळांमध्ये देखील तिच परिस्थिती आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन होत नसेल, तर शाळा महाविद्यालयाने तसे शिक्षण विभागास कळवून विद्यार्थी संख्या कमी करावी. तसेच पुन्हा एकदा अभ्याक्रम काहीसा कमी करून, किंवा ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवून परीक्षा घेता येतील. मात्र कोरोनाचा उद्र्ेक झाल्यास आणि त्यातून विद्यार्थी बाधित झाले तर त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागेल. पारनेर तालुक्यातील एका विद्यालयात एवढया मोठया संख्येने विद्यार्थी बाधित झाल्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला आहे. मात्र या प्रसंगाला धीराने तोंड देतच मार्ग काढावा लागणार आहे. या विद्यालयात 400 विद्यार्थ्यां उपस्थित होते. मात्र विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणात सर्दी आणि खोकला वाढत असल्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आलेल्या कोरोना चाचणीत अगोदर 19 आणि नंतर 52 विद्यार्थी बाधित निघाले. विशेष म्हणजे, याप्रकरणी चौकशी देखील करण्याची गरज आहे. शाळेवर शिकवणार्‍या शिक्षकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले बंधनकारक करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी या नियमांकडे दुर्लक्ष होते. शिवाय कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक प्रवास करून, किंवा इतर ठिकाणांहून आल्यास त्यास 8-10 दिवस क्वारंटाईन करून, त्याची चाचणी केल्यानंतरच त्यास त्या ठिकाणी हजर होऊ द्यावे. राज्य आणि केंद्र सरकारने कठोर नियमावली केली असली, तरी या नियमावलीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे राज्यात मोठया प्रमाणावर विद्यार्थी कोरोनाबाधित होतांना दिसून येत आहे. ओमायक्रॉनचे संकट असतांना, पुढील काही दिवस तरी महाराष्ट्रात निर्बंध लादावेच लागणार आहेत. उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात रात्रींचे निर्बंध लावण्यात आले आहेत. रात्री 9 ते 6 पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले असले तरी महाराष्ट्रात सर्रास राजकीय सभा, कार्यक्रमांसह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. याला कुठेतरी अटकाव घालण्याची गरज आहे. शिवसेना नेते संजय राठोड यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमाला एका अभिनेत्रीला आणल्यामुळे प्रचंड मोठया प्रमाणात गर्दी उसळली होती. मात्र या कार्यक्रमांवर किंवा आयोजकांवर कुठलीही कारवाई झाल्याचे समोर आलेले नाही. अशा सभा, सभागृह, कार्यक्रम सुरूच राहिले तर पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे असेच सुत्र ठेऊन आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. ही जागतिक आपत्ती असल्यामुळे पुन्हा एकदा पुरेशा खबरदार्‍या घेऊनच काय सुरू ठेवावे आणि सुरू ठेवायला नको, याचे धोरण ठरवावे लागेल.

COMMENTS