पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, यंदा सायकलीवरून करण्यात आलेल्या वारी
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, यंदा सायकलीवरून करण्यात आलेल्या वारीने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. भक्ती, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश देणार्या या उपक्रमात राज्याच्या कानाकोपर्यातील सुमारे सात हजार वारकरी सहभागी झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पंढरपूर सायकल मंडळाच्या पुढाकारातून सलग सातव्या वर्षी या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला वर्षागणिक वाढता प्रतिसाद मिळत असून, यंदाही नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, लातूर, नांदेड, जळगाव तसेच इतर अनेक जिल्ह्यांतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विठ्ठलनामाचा अखंड गजर, भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि सायकलीवरून पंढरपूरकडे वाटचाल करणारे वारकरी हे दृश्य भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. पारंपरिक वारीची शिस्त, भक्तिभाव आणि सामूहिकतेची भावना जपत या उपक्रमाने आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत असा नवा संदेश दिला. सायकल वारीत सहभागी झालेल्या वारकर्यांनी पर्यावरणाचे संरक्षण, इंधनाची बचत, प्रदूषणमुक्त प्रवास आणि नियमित व्यायामाचे महत्त्व याविषयी जनजागृती केली. त्यामुळे ही वारी केवळ धार्मिक परंपरेपुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि पर्यावरणीय जाणीव दृढ करणारा उपक्रम ठरत असल्याचे सहभागी वारकर्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सायकलीवरून पंढरी गाठणार्या वारकर्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची आस, हरिनामाचा अखंड गजर आणि शिस्तबद्ध प्रवास यामुळे सायकल वारीने आषाढी वारीत वेगळी छाप उमटवली आहे.

COMMENTS