बेलापूर: सततचा खंडित वीज पुरवठा, तसेच वीजपुरवठ्यात तांत्रिक कारणास्तव वारंवार येणारा व्यत्यय यामुळे बेलापूर गावचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झ

बेलापूर: सततचा खंडित वीज पुरवठा, तसेच वीजपुरवठ्यात तांत्रिक कारणास्तव वारंवार येणारा व्यत्यय यामुळे बेलापूर गावचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. महावितरणच्या या गलथान कारभाराला ग्रामस्थ पार वैतागले असून परिसरात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. बेलापूर सबस्टेशनला नियमितपणे सुरळीत व पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
बेलापूर सबस्टेशन येथे महावितरणचा ग्रामीण उपविभाग सुरू झाल्यामुळे वीज वितरणात मोठी सुधारणा होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, तसे न होता उलट वारंवार वीजपुरवठा खंडित होणे हे आता नेहमीचेच झाले आहे. विशेष म्हणजे, दर शनिवारी दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली अधिकृत शटडाउन घेतला जातो. असे असतानाही आठवड्याभर तांत्रिक कारणास्तव वारंवार वीज का गुल होते? आणि जर वीज जातेच, तर दर शनिवारी दुरुस्तीची नेमकी कोणती कामे केली जातात? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
विजेच्या या वारंवारच्या खेळखंडोब्यामुळे बेलापूर गावाच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. ज्या वेळी पाणी सोडले जाते नेमकी त्याच वेळी वीज नसते, आणि पाणी सोडल्यानंतर वीज मधेच गायब होते. महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे स्थानिक महिला भगिनी कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. या खंडित वीज पुरवठ्याचा थेट परिणाम शेती व इतर स्थानिक व्यवसायांवरही होत असून, शेतकरी आणि व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महावितरणच्या या ढिसाळ कारभाराबाबत जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, वीज वितरणात तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.

COMMENTS