कोलकाता : पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी गुरूवारी मतदान पार पडले. मात्र या मतदान प्रक्रियेदरम्यान राज्यातील विविध भागांत तणाव

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी गुरूवारी मतदान पार पडले. मात्र या मतदान प्रक्रियेदरम्यान राज्यातील विविध भागांत तणाव, धक्काबुक्की आणि हिंसक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट झटापट झाली, तर काही ठिकाणी उमेदवारांवरही हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदा परिसरात वातावरण विशेषतः तणावपूर्ण होते. येथे आम जनता उन्नयन पार्टीचे नेते हुमायूं कबीर घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांच्या समर्थक आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद पुढे हातघाईवर गेला. दगडफेक आणि मारामारीच्या घटनांमुळे परिस्थिती बिघडली आणि नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या गोंधळात कबीर यांच्या वाहनावरही दगड व काठ्यांनी हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते. दक्षिण मिदनापूर जिल्ह्यातील कुमारगंज मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुवेंदु सरकार यांच्यावरही हल्ला झाल्याची घटना समोर आली. जमावाच्या रोषापासून वाचण्यासाठी त्यांना पळ काढावा लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. त्यांच्या सुरक्षारक्षकाने हस्तक्षेप केला असला तरी जमावाने त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती आहे. आसनसोल दक्षिण मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या वाहनावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे. बर्नपूर परिसरात घडलेल्या या घटनेत त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. सुदैवाने त्या वेळी त्या सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. सिलीगुडी येथेही मतदान केंद्राबाहेर दोन प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. जगदीश चंद्र विद्यापीठ परिसरातील मतदान केंद्राजवळ सुरू झालेला हा वाद वाढण्याची चिन्हे दिसताच सुरक्षा दलांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मालदा जिल्ह्यात एका मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम बिघडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त मतदारांनी निवडणूक अधिकार्याला घेराव घालत नाराजी व्यक्त केली. मात्र, सुरक्षा कर्मचार्यांनी तत्परतेने हस्तक्षेप करत अधिकार्याला सुरक्षितस्थळी हलवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, विविध ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे मतदान प्रक्रियेवर सावट निर्माण झाले आहे. प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केल्याचे सांगितले जात असून, शांततेत मतदान पूर्ण करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
भाजप उमेदवार सुवेंदू सरकार हल्लाप्रकरणी
निवडणूक आयोगाने अहवाल मागवला
दक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंज येथे भाजप उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप टीएमसी कार्यकर्त्यांवर आहे. मतदानात व्यत्यय आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुवेंदू सरकार मतदान केंद्रावर पोहोचले होते. मतदान केंद्रात पोलिंग एजंटला प्रवेश न दिल्याचा आरोप करत त्यांनी एका व्यक्तीचा पाठलाग केला, त्यानंतर टीएमसी कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून मारहाण केली. निवडणूक आयोगाने घटनेच्या फुटेजमध्ये ओळख पटलेल्या व्यक्तींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले असून अहवालही मागवला आहे.

COMMENTS