पुणे : जिल्ह्यातील मावळ तालुक्यात थूगाव येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून पवना नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. फिरण्यासाठी आलेल्या या

पुणे : जिल्ह्यातील मावळ तालुक्यात थूगाव येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून पवना नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. फिरण्यासाठी आलेल्या या तरुणांनी पोहण्यासाठी नदीत उडी मारली; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयान शेख, प्रथमेश शिंदे आणि आश्विन भालेराव अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघेही पुणे येथील येरवडा परिसरातील असून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी थूगाव येथे आले होते. नदीत पोहण्यासाठी उतरल्यावर त्यांना पाण्याची खोली ओळखता आली नाही. तसेच ते खोल पाण्यातील भोवर्यात अडकल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे थंडावा मिळावा म्हणून हे तिघेही नदीत उतरले होते. मात्र पोहता न येणे आणि पाण्याचा चुकीचा अंदाज यामुळे त्यांचा जीव गेला. बराच वेळ हे तिघेही बाहेर न आल्याने त्यांच्या मित्रांनी घाबरून तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. गावकर्यांच्या मदतीने प्रशासनाने तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. पुढील तपासणीसाठी मृतदेह कामशेत येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, मावळ तालुक्यात याच आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या एकूण आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी पाण्यात उतरताना अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS