गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेला पश्चिम आशियातील संघर्षाला अल्प का होईना पण विराम लागल्याने संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 40 दिवसा

गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेला पश्चिम आशियातील संघर्षाला अल्प का होईना पण विराम लागल्याने संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 40 दिवसांपूर्वी अमेरिकेचे विक्षिप्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राएलला सोबत घेऊन इराणवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातूला खामेनी यांचा व त्यांच्या सहकार्यांचा मृत्यू झाला. जेव्हा अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला तेव्हा हे युद्ध फार फार तर दोन चार दिवस चालेल. त्यानंतर इराण अमेरिकेला शरण येईल आणि युद्ध संपुष्टात येईल जगाला वाटले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही तसेच वाटले होते. अमेरिका आणि इराण यांच्या सामर्थ्याची तुलनाच होऊ शकत नाही शिवाय अमेरिकेसोबत इस्राएल ही होता त्यामुळे इराणचा पराभव नक्की आहे अशाच भ्रमात सगळे राहिले ट्रम्प ही त्याच भ्रमात राहिले आणि तिथेच घात झाला. इराण अमेरिकेला शरण जाणे तर लांबच उलट इराणने अमेरिकेचा कडवा प्रतीकार केला. तो प्रतिकार इतका कडवा होता की अखेर अमेरिकेलाच या युद्धातून माघार घ्यावी लागली. हे युद्ध छेडून अमेरिकेने काही मिळवले नाही उलट स्वतःची नाचक्की करून घेतली. या युद्धात अमेरिकेची जितकी नाचक्की झाली तितकी याआधी कधी झाली नसेल. छोट्या राष्ट्रांवर विशेषतः तेल संपन्न राष्ट्रांवर अरेरावी करुन त्यांच्या कडील तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळवणे आणि त्याद्वारे जगावर हुकूमत गाजवणे आणि मीच जगात सर्वात शक्तिशाली असून मी सांगेल तेच इतरांनी केले पाहिजे या हुकूमशाही प्रवृत्तीने ट्रम्प यांनी इराणशी युद्ध छेडले. ज्या तेलासाठ्यांसाठी अमेरिकेने इराणसोबत युद्ध पुकारले ते तेलासाठे तर अमेरिकेला मिळालेच नाही उलट हे युद्ध छेडून अमेरिकेने स्वतःसह जगाला संकटाच्या खाईत लोटले. या युद्धाने संपूर्ण जगाचे नुकसान झाले. या युद्धात इराणचेही न भूतो असे नुकसान झाले. इराणच्या शेजारी असणार्या अरब राष्ट्रात अमेरिकेचे लष्करी तळ असल्याने इराणने त्या देशावर हल्ले केले त्यामुळे त्या देशांचेही खूप नुकसान झाले. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने तेथून होणारी तेल वाहतूक थांबली त्यामुळे तेल बाजार हादरले. इंधन दर वाढले. त्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाला बसला. अनेक देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. महागाई वाढली त्यामुळे सर्वसामान्यांचे जिने मुश्किल झाले. या युद्धाची झळ सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घराला बसली. या युद्धाने सर्वाधिक नुकसान झाले ते सर्वसामान्य नागरिकांचे. काहीही चूक नसताना सर्वसामान्य नागरिकांना या युद्धाची झळ सोसावी लागली. आता 14 दिवसांच्या युद्ध विरामाला दोन्ही देशांनी होकार दिल्याने सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. आता किमान पुढील 14 दिवस तरी दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होणार नाही. या 14 दिवसात दोन्ही देशात चर्चेच्या फेर्या घडतील. चर्चेसाठी आणि युद्धाला पूर्ण विराम देण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर 10 प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. या 10 मागण्या अमेरिकेने मान्य केल्या तरच पूर्ण युद्ध बंदी होईल असे इराणने ठणकावून सांगितले आहे. अर्थात चर्चेला बसल्यावर यातून तोडगा निघू शकतो. तसा तो निघावा आणि या युद्धाला कायमचा विराम लागावा अशीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत. या युद्धातून एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली की युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. युद्धाने कोणतेही प्रश्न सुटत नाही उलट वाढतात. युद्धाने कोणाचाही फायदा होत नाही होते ते नुकसानच. युद्धाचा शेवट हा विनाशानेच होतो. युद्धात कोणीही जिंकत नाही कोणीही हरत नाही हरते ती मानवता म्हणूनच जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे.
श्याम ठाणेदार (जिल्हा. पुणे, ता. दौंण्ड)


COMMENTS