मानवी जीवनात संगतीचा परिणाम फार मोठा असतो. वाईट संगतीमुळे चांगल्या माणसाचेही नुकसान होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांनी व्यसनांच्या आहारी न ज

मानवी जीवनात संगतीचा परिणाम फार मोठा असतो. वाईट संगतीमुळे चांगल्या माणसाचेही नुकसान होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता संतांचे विचार आत्मसात करावेत. संतांचे विचार आणि हरिनाम हेच जीवन खर्या अर्थाने समाधानी आणि आनंदी करण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. गीतांजली झेंडे यांनी केले.
येथील स्वर्गीय झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित ’अधिकमास महात्म्य कथे’तून त्या बोलत होत्या. प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड आणि पदाधिकार्यांच्या हस्ते ताईंचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कथा भागातून उपदेश करताना गीतांजली झेंडे म्हणाल्या, भारतीय संस्कृतीत दर तीन वर्षांनी येणार्या अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळात मानवाकडून भक्ती आणि पुण्यकर्म अधिक घडले पाहिजे. विशेषत: अधिक मासातील ’द्वादशी’ व्रताचे फळ प्रयाग स्नानासारखे आहे. पुढे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत त्या म्हणाल्या की,ज्याप्रमाणे ऐरणीवरचा हिरा घणाच्या प्रहाराने फुटत नाही, मात्र ढेकणाच्या संगतीने तो भंग पावतो; तद्वतच कुसंगतीमुळे सज्जन माणसाचीही प्रतिष्ठा धुळीस मिळते. त्यामुळे तरुणांनी आपली संगत पारखून निवडावी. शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक नुकसान करणार्या व्यसनांच्या विळख्यात न अडकता संत विचारांचे मनन-चिंतन करावे. शरीराची हानी करण्यापेक्षा हरिनामाचे व्यसन जडावे, दृष्टी चांगली असेल तरच सृष्टी चांगली दिसेल, या शब्दांत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कथा श्रवणाला बीड शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खटोड प्रतिष्ठानच्या वतीने अधिकमासाचे महत्त्व तरुण पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने या कथेचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS