राज्य सरकारकडून एसटी प्रवाशांच्या सुविधांसाठी विविध योजना व उपक्रमांची घोषणा केली जात असताना प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांना मूलभूत

राज्य सरकारकडून एसटी प्रवाशांच्या सुविधांसाठी विविध योजना व उपक्रमांची घोषणा केली जात असताना प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र लिंबागणेश येथे पाहायला मिळाले. वसई-अंबेजोगाई मार्गावरील एसटी बस तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडल्याने प्रवाशांना तब्बल तीन तासांहून अधिक काळ अडकून पडावे लागले.
रविवार (दि. 17) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वसई-अंबेजोगाई ही एसटी बस लिंबागणेश येथील बसस्थानकावर पोहोचताच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना याचा फटका बसला. घटनेनंतर चालकाने तत्काळ पाटोदा आगारप्रमुखांशी संपर्क साधून माहिती दिली. मात्र मेकॅनिक रात्री 11 वाजता येईल, त्यानंतरच दुरुस्ती होईल, असे उत्तर मिळाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. पर्यायी बस उपलब्ध करून देणे किंवा तातडीची मदत पुरविण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही तत्परता दाखविण्यात आली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे व पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी बीड विभागप्रमुख अनुजा दुसाने यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती डॉ. गणेश ढवळे यांनी दिली. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. गणेश ढवळे म्हणाले, एसटी महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी आहे की गैरसोयीसाठी, असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांना तासन्तास अडकवून ठेवणे ही अत्यंत असंवेदनशील बाब असून संबंधित विभागाने याची गंभीर दखल घ्यावी. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या नियोजनावर आणि प्रवासी सेवांवरील तत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS