नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा संभाव्य कट सुरक्षा यंत्रणांनी वेळीच उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा संभाव्य कट सुरक्षा यंत्रणांनी वेळीच उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पंजाब आणि दिल्लीमध्ये समन्वयाने राबविलेल्या व्यापक कारवाईत चार संशयितांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून परदेशी बनावटीची पिस्तुले, काडतुसे आणि दूरध्वनी संच जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा संबंध पाकिस्तानमधील काही सूत्रधारांशी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
विशेष पथकाचे वरिष्ठ अधिकारी प्रवीणकुमार त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीत मोठी विध्वंसक कारवाई घडवून आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर तांत्रिक पुरावे, संवादांची पडताळणी आणि विविध स्तरांवरील माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात करण्यात आली. प्राथमिक चौकशीत पंजाबमधील काही तरुणांना या जाळ्यात ओढल्याचे समोर आले. या मोहिमेअंतर्गत सर्वप्रथम शुभदीप सिंग उर्फ विशला याला पंजाबमधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक स्वयंचलित पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि दोन दूरध्वनी संच जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सीमावर्ती भागातून मानवरहित यंत्रांच्या माध्यमातून शस्त्रे आणि अमली पदार्थांची खेप स्वीकारल्याची माहिती दिल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे. तसेच परदेशातील सूत्रधारांशी संपर्क असल्याचेही तपासात पुढे आले. शुभदीपकडून मिळालेल्या माहितीनंतर विशेष पथकाने गुरजंत सिंग उर्फ ऋषी आणि साजन सिंग उर्फ हनी यांना पंजाबमध्ये अटक केली. त्यांच्या ताब्यातून परदेशी बनावटीचे आणखी एक पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली. या दोघांनीही विविध संशयास्पद हालचालींमध्ये सहभाग घेतल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर गगनप्रीत या चौथ्या संशयिताला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्याच्या दूरध्वनी संचातील माहितीची तपासणी सुरू असून, त्यातून अनेक महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राजधानीतील विविध संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून त्याचे चित्रण परदेशातील सूत्रधारांकडे पाठविण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले होते, असा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, देशातील इतर राज्यांमध्ये या जाळ्याचे धागेदोरे आहेत का, याचाही तपास सुरू आहे. शस्त्रांची तस्करी, अमली पदार्थांचे व्यवहार आणि दहशतवादी कारवायांमधील संभाव्य संबंधांचा सखोल शोध घेतला जात आहे.
दहशतवाद्यांनी केली होती रेकी
तपासात असेही उघड झाले आहे की, पोलीस ठाणी, पोलीस चौक्या आणि प्रमुख धार्मिक स्थळांची रेकी करण्याचे काम काही सदस्यांकडे देण्यात आले होते. या माहितीचा वापर करून भविष्यात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकला असता, अशी भीती अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, राजधानीतील एखाद्या गर्दीच्या भागात अंदाधुंद गोळीबार करून नागरिकांमध्ये भीती आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचाही कट रचला गेला होता. मात्र, वेळेवर मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सुरक्षा यंत्रणांनी हा डाव हाणून पाडला.

COMMENTS