Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपात घुसमट; खा. अशोकराव चव्हाण यांची काँग्रेसकडे पुन्हा नजर? खा. रवींद्र चव्हाण यांचा थेट हल्लाबोल

नांदेड : नांदेडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे भाजपात अस्वस्थ झाल्याने पुन्

भाजपाच्या रणनीतीचा नवा अध्याय? एमआयएमचे मसूद अहमद खान विरोधी पक्षनेतेपदी; मनपा राजकारणात खळबळ
काँग्रेसने महिला आरक्षणात विनाकारण खोडा घातला : चव्हाण
भूमी अभिलेख कार्यालयावरून श्रेयाची लढाई; शांतपणे डाव साधला खा.चव्हाण यांनी

नांदेड : नांदेडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे भाजपात अस्वस्थ झाल्याने पुन्हा काँग्रेसकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काँग्रेसमध्ये असताना खा.अशोकराव चव्हाण यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, स्वतंत्र नेतृत्वाची ओळख आणि कार्यकर्त्यांशी थेट संवादाची ताकद होती. मात्र भाजपात गेल्यानंतर त्यांना अपेक्षित मानमरातब, राजकीय वजन आणि निर्णयप्रक्रियेत स्थान मिळाले नाही. त्यामुळेच आता ते पुन्हा राहुल गांधी आणि काँग्रेस नेतृत्वाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खा.रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला. भाजपात बाहेरून आलेल्या नेत्यांना फक्त दर्शनी स्थान दिले जाते, पण प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत त्यांना दुय्यम वागणूक मिळते, असा आरोप त्यांनी केला. वैयक्तिक नेतृत्व दडपून केंद्रीकृत पद्धतीने पक्ष चालवला जात असल्याने अनेक नेते नाराज असल्याचेही त्यांनी म्हटले. नांदेड जिल्ह्यात खा. अशोकराव चव्हाण यांचे अजूनही मजबूत वैयक्तिक नेटवर्क असल्याचे मानले जाते. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत त्यांचा प्रभाव कायम असल्याने त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे समर्थक आणि विरोधक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जर त्यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरली, तर नांदेडसह मराठवाड्यातील राजकीय समीकरणे एका रात्रीत बदलू शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, भाजपकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस शिबिरात मात्र या वक्तव्यामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी उघडपणे स्वागताची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. खा. अशोकराव चव्हाण यांची पुढील राजकीय चाल काय असेल, ते भाजपातच राहणार की पुन्हा काँग्रेसच्या दारात जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

COMMENTS