नांदेड : भारतातील पहिल्या डिजिटल जनगणना (जनगणना 2027) मोहिमेला सुरुवात झाली असून महानगरपालिका क्षेत्रातील ‘स्व-गणना’ उपक्रमाचा शुभारंभ 1 मे 2026

नांदेड : भारतातील पहिल्या डिजिटल जनगणना (जनगणना 2027) मोहिमेला सुरुवात झाली असून महानगरपालिका क्षेत्रातील ‘स्व-गणना’ उपक्रमाचा शुभारंभ 1 मे 2026 रोजी महापौर यांच्या हस्ते करण्यात आला. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी 5 मे रोजी आपल्या निवासस्थानी ऑनलाइन माध्यमातून स्वतःची माहिती नोंदवून या मोहिमेत सहभाग नोंदविला.
या वेळी भोकर मतदारसंघाच्या आमदार जयाताई चव्हाण, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, क्षेत्रीय अधिकारी रमेश चवरे, कनिष्ठ अभियंता रविंद्र सरपाते आदी उपस्थित होते. खासदार चव्हाण यांनी जनगणनेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अचूक व अद्ययावत आकडेवारी आवश्यक आहे. त्यांनी स्वतः स्व-गणना करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. यावेळी आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या तांत्रिक तयारीची माहिती देत सांगितले की, स्व-गणना प्रक्रिया ही सोपी, सुरक्षित आणि वेळ वाचवणारी आहे. नागरिकांनी अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या कुटुंबाची अचूक माहिती वेळेत नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमार्फत ही जनगणना प्रक्रिया राबविण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेडकरांनी देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. स्व-गणनेमुळे वेळेची बचत होऊन अचूक माहिती संकलनास मदत होते. विकासाच्या नियोजनासाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची असल्याने प्रत्येक नागरिकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे – खा. अशोक चव्हाण

COMMENTS