मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीकडून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीकडून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती, तर महाविकास आघाडीतर्फे जगन्नाथ अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सभागृहातील परंपरा जपण्यासाठी आणि सर्वानुमते निवड व्हावी या भूमिकेतून विरोधकांनी ऐनवेळी आपला अर्ज मागे घेतल्याने सचिन अहिर यांची एकमताने निवड झाली.
उपसभापती निवडीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित होते. त्यानंतर आवाजी मतदानाद्वारे अहिर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. विधान परिषदेत महायुतीचे संख्याबळ अधिक असल्याने सचिन अहिर यांच्या विजयाची शक्यता आधीपासूनच स्पष्ट होती. मात्र, संसदीय परंपरा अबाधित राहावी आणि निवडणूक सर्वानुमते व्हावी, यासाठी सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर विरोधी पक्षानेही सभागृहाच्या इच्छेला मान देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली आणि सभागृहात एकमताचा संदेश देण्यात आला. सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कामगार चळवळीतून सुरू झाला. गिरणी कामगारांच्या प्रश्नांशी निगडित काम करत त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले आणि मंत्रीपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली. अभ्यासू, संवादकुशल आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक कार्य, सांस्कृतिक उपक्रम आणि जनसंपर्क यांमुळे त्यांचा व्यापक जनाधार तयार झाला असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.
अहिर निर्भीड आणि न्यायप्रिय नेतृत्व ठरेल : मुख्यमंत्री फडणवीस
सचिन अहिर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. अनेक वर्षांचा सहवास आणि सार्वजनिक जीवनातील अनुभव लक्षात घेता, ते निर्भीड, अभ्यासू आणि सर्व सदस्यांना समान न्याय देणारे उपसभापती ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांनी सांगितले की, सार्वजनिक प्रश्नांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तोडगा काढण्याची क्षमता अहिर यांच्यात आहे. विविध स्तरांवरील लोकांशी संवाद साधण्याची त्यांची शैली त्यांना वेगळे स्थान मिळवून देते, असेही त्यांनी नमूद केले.
राजकारणी नव्हे, समाजकारणी म्हणून ओळख : उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सचिन अहिर यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. सार्वजनिक जीवनात संयम, समन्वय आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. कामगार चळवळीशी असलेले त्यांचे घट्ट नाते आणि समाजकारणातील योगदान यामुळे ते केवळ राजकीय नेते नसून समाजहितासाठी कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात, असेही शिंदे यांनी नमूद केले.

COMMENTS