अमेरिका-भारत संभाव्य व्यापार कराराच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार नवी दिल्ली: भारत-अमेरिका संभाव्य व्यापार कराराच्या विरोधात पंजाबमधील शेतकरी

अमेरिका-भारत संभाव्य व्यापार कराराच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
नवी दिल्ली: भारत-अमेरिका संभाव्य व्यापार कराराच्या विरोधात पंजाबमधील शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच सुरू केले आहे. मंगळवारी सकाळपासून मोठ्या संख्येने शेतकरी पटियाला-अंबाला मार्गावरील शंभू सीमा तसेच संगरूर-जिंद मार्गावरील खनौरी सीमेजवळ एकत्र जमले. परिस्थिती लक्षात घेऊन हरियाणा प्रशासनाने दोन्ही सीमांवर कडेकोट बंदोबस्त करत प्रवेश रोखला असून, बॅरिगेड्स उभारून सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.
सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा आंदोलनासाठी कायमस्वरूपी ठाण मांडण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीही सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी सीमेलगतच ठिय्या आंदोलन करत असून, दीर्घकालीन आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनांचे नेते सरवण सिंह पंढेर करत आहेत.
शेतकऱ्यांची वाढती गर्दी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने अंबाला जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत लागू असलेल्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. सीमेजवळील बॅरिगेड्सपासून शंभर मीटर अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
शंभू सीमा बंद झाल्यामुळे जालंधर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले असून, प्रवाशांनी प्रशासनाने सुचवलेल्या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तातडीच्या मदतीसाठी आणीबाणी क्रमांकावर संपर्क साधण्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
शंभू सीमा यापूर्वीही शेतकरी आंदोलनामुळे तब्बल तेरा महिने बंद होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये सीमा बंद करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार मार्च २०२५ मध्ये ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. आता पुन्हा आंदोलनामुळे या मार्गावर निर्बंध लागू करण्यात आल्याने वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकरी नेते सरवण सिंह पंढेर यांनी सांगितले की, शेतकरी शांततापूर्ण मार्गाने दिल्लीत जाऊन आपली भूमिका सरकारसमोर मांडू इच्छितात. कोणत्याही प्रकारचा संघर्ष घडवून आणण्याचा त्यांचा हेतू नसून, प्रशासनाने संवादाचा मार्ग स्वीकारावा, अशी त्यांची भूमिका आहे. आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांची तातडीने सुटका करावी, अशीही त्यांनी मागणी केली.
करारच झालेला नाही: भाजपची भूमिका
पंजाब भाजपचे प्रवक्ते अनिल सरीन यांनी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत तपशील जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत कराराच्या विरोधात आंदोलन करण्याचे कारण समजत नाही. काही घटक राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

COMMENTS