नांदेड : हदगाव तालुक्यातील निवघा बाजार गावात पत्त्याच्या डावावरून झालेल्या पैशांच्या उधारीच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची
नांदेड : हदगाव तालुक्यातील निवघा बाजार गावात पत्त्याच्या डावावरून झालेल्या पैशांच्या उधारीच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याला वाचवताना त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गावात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय नारायण (बाळू) कदम (वय २३, रा. निवघा, ता. हदगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर रामा मारोती गजभारे (वय २२) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास विजय कदम व रामा गजभारे हे गावात पत्त्याचा डाव खेळत बसले होते. त्यावेळी दुसऱ्या गटातील काही युवक तेथे आले आणि जुन्या उधारीच्या पैशांवरून त्यांच्यात वाद सुरू झाला.
विजय व रामा यांनी आपले पैसे परत मागितल्याने शाब्दिक बाचाबाची झाली आणि याचे रूपांतर काही वेळातच हिंसक हाणामारीत झाले. दरम्यान, एका आरोपीने धारदार शस्त्राने केलेल्या भीषण हल्ल्यात विजय कदम यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या रामाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS