देवळाली प्रवरा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत देवळाली प्रवरा हद्दीतील पात्र शेतकऱ्यांना मिळणारी सुमारे सहा कोटी रु

देवळाली प्रवरा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत देवळाली प्रवरा हद्दीतील पात्र शेतकऱ्यांना मिळणारी सुमारे सहा कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम तांत्रिक कारणामुळे परत गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व नाराजी निर्माण झाली असून, येत्या आठ दिवसांत तांत्रिक त्रुटी दूर करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करावी; अन्यथा देवळाली प्रवरा सोसायटी व शासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. कर्जमाफीची रक्कम परत गेल्याची माहिती मिळताच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी देवळाली प्रवरा सोसायटीमध्ये जाऊन याबाबत माहिती घेतली. सोसायटीचे मॅनेजर चव्हाण यांच्याकडून कर्जमाफीच्या रकमेबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी झालेल्या प्रकारासाठी सोसायटी जबाबदार नसून, वरच्या स्तरावरूनच तांत्रिक चूक झाल्याचे सांगण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. देवळाली प्रवरा सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या कर्जमाफीची सुमारे सहा कोटी रुपयांची रक्कम परत गेल्याची माहिती समोर आल्याने या प्रकाराला नेमके जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तालुक्यातील इतर ठिकाणी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना केवळ देवळाली प्रवरा सोसायटीची रक्कम मागे का गेली, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे,अरुण ढूस, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे विरोधी पक्षगटनेते दासूभाऊ पठारे, प्रहारचे आप्पासाहेब ढूस, माजी संचालक नानासाहेब कदम, देवराम कडू आदी उपस्थित होते.

COMMENTS