अकोले : सत्तेत असताना आणि सत्तेबाहेर असतानाही कै. मधुकरराव पिचड यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी लढाऊ भूमिका कायम ठेवली. भंडारदरा धरणाच्या पाण्यावरील

अकोले : सत्तेत असताना आणि सत्तेबाहेर असतानाही कै. मधुकरराव पिचड यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी लढाऊ भूमिका कायम ठेवली. भंडारदरा धरणाच्या पाण्यावरील हक्क, निळवंडे धरण उभारणीतले योगदान आणि दुग्ध व्यवसायातील श्वेतक्रांती यांसाठी त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले, असे प्रतिपादन डॉ. सुनील शिंदे यांनी केले.
अगस्ती महाविद्यालय व अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने आयोजित कै. मधुकरराव पिचड जयंती व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी शेतकरी नेते दशरथ सावंत होते.
उपसा सिंचन योजना, लहान-मोठे बंधारे, पूल उभारणी, पाण्याखालील मार्ग तसेच दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. प्रभावी जलव्यवस्थापनाबाबत त्यांची दूरदृष्टी आणि कृतीशीलता विशेष ठळकपणे दिसून आली, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात दशरथ सावंत म्हणाले, की प्रशासनावर पिचड यांची प्रभावी पकड होती. धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुनर्वसनाची प्रभावी अंमलबजावणी केली. उपेक्षित व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यासपूर्ण आराखडा त्यांच्या कार्यपद्धतीचा केंद्रबिंदू होता.
राजूरच्या माजी सरपंच हेमलता पिचड यांनी मनोगतातून कै. मधुकरराव पिचड यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेतला.यावेळी ‘लोकनेते मधुकरराव पिचड तंत्रनिकेतन, अकोले’ या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. हेमलता पिचड, दशरथ सावंत, कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, कोषाध्यक्ष धनंजय संत, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, डॉ. सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS