तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या माहूर शहरात उन्हाळ्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवते. अशा परिस्थितीत जय जंगो रायताड प्रतिष्ठानच्या

तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या माहूर शहरात उन्हाळ्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवते. अशा परिस्थितीत जय जंगो रायताड प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणारा मागेल त्याला मोफत पाणी टँकर हा उपक्रम नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
आ. भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने यांनी सुरू केलेला हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. शहरातील विविध भागांमध्ये दररोज सुमारे 20 ते 25 घरांना मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम तसेच इतर आवश्यक प्रसंगीही नागरिकांना तातडीने टँकर सेवा उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय माहूर बसस्थानकासमोर थंडगार आरओचे शुद्ध पाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामीण भागातून येणारे नागरिक, प्रवासी आणि देवी दर्शनासाठी येणार्या भाविकांना या सुविधेचा मोठा लाभ होत असून, उन्हाळ्यात ही सेवा अनेकांसाठी दिलासादायक ठरत आहे. गोपू महामुने यांनी सांगितले की, या शहराने मला खूप काही दिले आहे. समाजासाठी काहीतरी उपयोगी कार्य करावे या भावनेतूनच मी ही सेवा सुरू केली. या उपक्रमामागे कोणताही स्वार्थ नसून समाजाचे ऋण फेडण्याची भावना आहे. या उपक्रमात सहकारी निलेश तायडे यांचेही मोलाचे योगदान असून, गरीब-श्रीमंत भेद न करता सर्वांना समानतेने मदत केली जात असल्याने नागरिकांकडून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धार्मिक आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या माहूर शहरात राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून, नागरिकांसाठी खर्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.

COMMENTS