नांदेड : शहरातील वाढत्या वीज खंडितीच्या पार्श्वभूमीवर महापौर कविता मुळे यांनी महावितरण प्रशासनावर थेट जबाबदारी टाकत आक्रमक भूमिका घेतली. सततच्या

नांदेड : शहरातील वाढत्या वीज खंडितीच्या पार्श्वभूमीवर महापौर कविता मुळे यांनी महावितरण प्रशासनावर थेट जबाबदारी टाकत आक्रमक भूमिका घेतली. सततच्या तक्रारींमुळे नागरिक त्रस्त असताना, महापालिकेत बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत महावितरण अधिकार्यांना जाब विचारण्यात आला.
महापौरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, वीजपुरवठ्यातील हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. उन्हाळ्याच्या कडाक्यात वारंवार होणार्या खंडितीमुळे जनतेचा संताप वाढत असून, तांत्रिक कारणांच्या नावाखाली चालणारी ढिलाई त्वरित थांबवावी, असा इशारा त्यांनी दिला. तक्रार निवारण यंत्रणा निष्क्रिय असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी अधिकार्यांना धारेवर धरले आणि 24 तास कार्यरत व्यवस्था उभी करण्याचे आदेश दिले. आगामी पावसाळ्याचा विचार करून धोकादायक वीज तारा, वाकलेले खांब आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शहरातील अंधारलेल्या रस्त्यांबाबत मनपा व महावितरण यांच्यातील समन्वय अभावावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महावितरणकडून उत्तर नांदेड भागात 50 नवीन डी.पी. उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यासाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. पिरबुर्हान नगर येथे उपकेंद्रासाठी महापालिकेची जागा देण्याचा निर्णयही बैठकीत पुढे आला. महावितरण अधिकार्यांनी वाढत्या विजेच्या लोडमुळे समस्या निर्माण होत असल्याचे मान्य करत, त्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनांवर समाधान न मानता महापौरांनी स्पष्ट केले की, नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळालाच पाहिजे; अन्यथा प्रशासनाला जबाबदार धरले जाईल. या पार्श्वभूमीवर मनपा व महावितरण यांच्यात संयुक्त समन्वय यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या काळात वीजप्रश्नावर अधिक कडक भूमिका घेतली जाण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS