कर्जत : तालुक्यातील आंबीजळगाव येथील शेतकरी बबन रासकर यांना निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. रासकर यांनी आपल्या शेतात स

कर्जत : तालुक्यातील आंबीजळगाव येथील शेतकरी बबन रासकर यांना निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. रासकर यांनी आपल्या शेतात सुमारे तीन एकर क्षेत्रामध्ये कांचन सीड्स कंपनीचे मका बियाणे पेरले होते. मात्र, पेरणीनंतर अपेक्षित प्रमाणात उगवण न झाल्याने संपूर्ण पीक जवळपास वाया गेले असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या संदर्भात संबंधित कंपनीशी संपर्क साधला असता, कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी संघटनांकडे धाव घेतली आहे.
प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम निकत यांनी या प्रकरणात पुढाकार घेत, संबंधित बियाण्यांची सखोल तपासणी करून कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संघटनेच्या वतीने कृषी विभागाच्या गुणनियंत्रण कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, शेतकऱ्याला तातडीने न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कृषी विभागाच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. बियाण्यांची नमुने तपासणीसाठी घेतली असून, अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी मोठ्या विश्वासाने बियाण्यांची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या अनुभवामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित कंपनी शेतकऱ्याला नुकसानभरपाई कधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS