नांदेड : शहरातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना आता वाहतूक सिग्नलवर थांबणार्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले

नांदेड : शहरातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना आता वाहतूक सिग्नलवर थांबणार्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये अनेक ठिकाणी एक ते दीड मिनिटांपेक्षा जास्त वेळ सिग्नल लागतो. त्यामुळे वाहनचालकांना कडक उन्हात रस्त्यावर उभे राहावे लागत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे.
सध्या शहरातील तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील डांबरीकरण तापून निघत असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांसह प्रवास करणार्या कुटुंबांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांनी महापालिका व पोलीस प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. ज्या ठिकाणी सिग्नलचा कालावधी अधिक आहे, त्या चौकांमध्ये तातडीने ग्रीन मॅट टाकण्यात याव्यात, जेणेकरून उष्णतेची तीव्रता कमी होईल. तसेच पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था, तात्पुरती सावलीची सोय आणि जनजागृती फलक उभारावेत, अशीही मागणी पुढे आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी त्वरित कृतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS