श्रीगोंदा: तालुक्यातील लोणी व्यंकनाथ परिसरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी (१९ जुलै) मध्यरात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे

श्रीगोंदा: तालुक्यातील लोणी व्यंकनाथ परिसरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, रविवारी (१९ जुलै) मध्यरात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने शेतकरी अशोक मुरलीधर काकडे यांच्या बैलावर हल्ला करून त्याचा बळी घेतला, तर त्याच रात्री नागवडे कारखान्याचे माजी संचालक दिलीपराव काकडे यांची गाय बेपत्ता झाली असून ती बिबट्याने फस्त केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वर्षभरापासून लोणी व्यंकनाथ येथील उत्तर काकडेवाडी व दक्षिण काकडेवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. वारंवार पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली शेतीची कामे करत असून, अनेक मजूरही या भागात कामासाठी येण्यास धजावत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
लोणी व्यंकनाथ परिसरातील अनेक शेतकरी शेतावरच वास्तव्यास असून, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. कर्ज काढून खरेदी केलेल्या दुभत्या जनावरांवर बिबट्याचे हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून ज्या ठिकाणी त्यांचा वावर अधिक आहे त्या ठिकाणी तातडीने पिंजरे लावावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा भविष्यात महिला, लहान मुले आणि शेतावर राहणाऱ्या नागरिकांवरही हल्ल्याचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच नंदकुमार कुरुमकर यांनी रेंज फॉरेस्ट ऑफिसर दिपाली भगत यांच्याशी संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. त्यानंतर वनरक्षक चंद्रकांत मरकड व वनमजूर नारायण कराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बैलाचा पंचनामा केला. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी अशोक मुरलीधर काकडे, अमोल विकास काकडे, पंकज जिजाबा काकडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी वनविभागाने केवळ पंचनामे न करता बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी केली आहे.

COMMENTS