अॅमस्टरडॅम : जगासमोर आज गंभीर संकट निर्माण झाले आहे. कोरोनानंतर निर्माण झालेले युद्ध आणि त्यानंतर आलेले ऊर्जा संकट यामुळे जगासाठी हे दशक आपत्तीच

अॅमस्टरडॅम : जगासमोर आज गंभीर संकट निर्माण झाले आहे. कोरोनानंतर निर्माण झालेले युद्ध आणि त्यानंतर आलेले ऊर्जा संकट यामुळे जगासाठी हे दशक आपत्तीचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केले. नेदरलँड्स दौऱ्यावर भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी जागतिक परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच या परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर अनेक दशकांच्या विकासावर पाणी फेरू शकते आणि मोठा समाज पुन्हा गरिबीच्या दलदलीत अडकू शकतो, असा इशारा दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचे जग वेगाने बदलत आहे आणि प्रत्येक देशाला नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे. भारतही आता वेग, गुणवत्ता आणि आधुनिकतेच्या दिशेने पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय तरुण आता केवळ नोकरी शोधणारे नाहीत, तर नव्या संधी निर्माण करणारे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटल व्यवस्थेच्या माध्यमातून भारताने जगासमोर आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक आणि वेगवान झाले आहेत.
सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात प्रगती
देशात बारा सेमीकंडक्टर प्रकल्पांवर काम सुरू असून त्यापैकी दोन प्रकल्पांत उत्पादन सुरू झाले आहे. भविष्यात चिप्सची रचना आणि निर्मिती दोन्ही भारतातच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अलीकडील निवडणुकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढल्याचे सांगत भारतीय लोकशाही अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी नवउद्योग (Startup) व्यवस्था
भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी नवउद्योग व्यवस्था बनल्याचे सांगताना मोदी यांनी देशात दोन लाखांहून अधिक नवउद्योग (स्टार्टअप्स) कार्यरत असल्याची माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण, अंतराळ आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय तरुण मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी देशात नवउद्योगांची संख्या अत्यंत अल्प होती; मात्र आज भारत जागतिक पातळीवर मोठी झेप घेत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

COMMENTS