मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींनी पुन्हा एकदा चर्चेला उधाण आणले आहे. पक्षाच्या कार्यकारिणीतून ज्येष

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींनी पुन्हा एकदा चर्चेला उधाण आणले आहे. पक्षाच्या कार्यकारिणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना कथितपणे दुय्यम स्थान दिल्याबद्दलच्या चर्चेमुळे पक्षातील अंतर्गत संघर्षाच्या शक्यतांना हवा मिळत आहे. अधिकृत स्तरावर या चर्चांचे खंडन करण्यात आले असले, तरी त्यानंतर झालेल्या राजकीय भेटीगाठी आणि सूचक वक्तव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या हातात आली आहे. मात्र, पक्षावर दीर्घकाळ प्रभाव ठेवणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये निर्माण होत असलेली अस्वस्थता आता उघडपणे जाणवू लागल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाचे केंद्रीकरण सुरू आहे का, अशी चर्चा रंगली आहे. सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना “आम्हाला ४२ वर्षांचा राजकीय अनुभव आहे” असे वक्तव्य केले. या विधानातून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे प्रभावी चेहरे राहिले आहेत. तटकरे यांनी कोकणात पक्ष संघटना मजबूत केली, तर पटेल यांनी राष्ट्रीय स्तरावर पक्षाची ओळख निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना कथितपणे बाजूला केले जात असल्याची भावना निर्माण झाली, तर त्याचे परिणाम संघटनात्मक पातळीवर उमटू शकतात, असे मत व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली नसली, तरी त्यांची शांत भूमिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली बाब म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली शरद पवारांची भेट. दोन्ही नेत्यांनी अलीकडेच शरद पवारांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांनीही सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या राजकीय अनुभवाचे आणि कार्यशैलीचे कौतुक केले होते. गेल्या काही महिन्यांत पार्थ पवार यांचा पक्षातील वाढता सहभागही चर्चेचा विषय ठरत आहे. विविध बैठका, युवा कार्यकर्त्यांशी संवाद आणि संघटनात्मक निर्णय प्रक्रियेत त्यांची उपस्थिती वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पक्षात नव्या पिढीचे नेतृत्व पुढे आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

COMMENTS