ठाणे : राज्यभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून हे खड्डे नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत
ठाणे : राज्यभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून हे खड्डे नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे टीडीआरएफ (TDRF) पथकातील कर्तव्यदक्ष जवान विकास लहू गोरे (वय ३१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे सकाळी आपल्या बुलेट दुचाकीवरून कर्तव्यावर निघाले होते. भारंगी नदीच्या पुलाजवळ रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने त्यांचा ताबा सुटला आणि ते दुभाजकावर (डिव्हायडर) जोरात आपटले. गंभीर जखमी झालेल्या विकास गोरे यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
विकास गोरे हे २०१९ पासून ठाणे TDRF मध्ये कार्यरत होते. बदलापूर-वांगणी येथील महालक्ष्मी एक्स्प्रेस रेस्क्यू, इरशाळवाडी दुर्घटनेतील मदतकार्य, तळिये गावातील भूस्खलन आणि नुकत्याच झालेल्या भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवले होते. इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या जिगरबाज जवानाचा स्वतःचा जीव मात्र महामार्गावरील खड्ड्यामुळे गेला, याबद्दल परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. गोरे हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते; त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि अवघ्या १४ महिन्यांच्या दोन जुळ्या मुली असा परिवार आहे. या घटनेनंतर मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

COMMENTS