मुंबई : लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. योजनेच्या निकषांमध
मुंबई : लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांचेच मानधन बंद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पात्र महिलांना लाभ देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून, केवायसी न झालेल्या पात्र महिलांना पुन्हा संधी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, योजना सुरू करताना वय, उत्पन्न, शासकीय नोकरी, प्राप्तिकर भरणे आणि चारचाकी वाहनाची मालकी यांसारखे निकष निश्चित करण्यात आले होते. सुरुवातीला स्वयंप्रमाणपत्राच्या आधारे अर्ज स्वीकारले गेले, मात्र नंतर झालेल्या पडताळणीत धक्कादायक बाबी समोर आल्या. यामध्ये १४ हजार पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज केल्याचे, सुमारे ५ लाख शासकीय कर्मचारी, १० लाख प्राप्तिकर भरणारे तसेच ४ ते ५ लाख चारचाकी वाहनधारक चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याचे आढळून आले.
दरम्यान, केवायसी प्रक्रियेसाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही अनेक लाभार्थ्यांनी ती पूर्ण केली नव्हती. तरीही सुमारे २५ लाख महिलांच्या केवायसीतील त्रुटी दुरुस्त करून त्यांना पुन्हा पात्र करण्यात आले आहे. ज्या पात्र महिलांची केवायसी राहून गेली आहे, त्यांच्यासाठी शासन पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यास तयार आहे. तसेच, यापूर्वी अपात्र ठरूनही लाभ घेतलेल्या महिलांकडून कोणतीही वसुली केली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
१ कोटी ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट “प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून आम्ही ५ लाख महिलांना १ ते दीड लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले असून त्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून वळता केला जात आहे. आम्ही फक्त १५०० रुपयांवर थांबणार नाही, तर राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी ‘लखपती दीदी’ बनवण्यावर आमचा भर आहे. सध्या ५० लाख बहिणी लखपती दीदी झाल्या असून, हा टप्पा १ कोटी बहिणींपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

COMMENTS