मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविक आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष नियोजन केले आ
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविक आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. यंदा 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील विविध मार्गांवर 5 हजार 220 जादा बसगाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील लाखो चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित नियोजन बैठकीत या विशेष वाहतूक आराखड्याचा आढावा घेण्यात आला. बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या श्रद्धा, परंपरा आणि भावविश्वाशी जोडलेला सण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आर्थिक नफा-तोट्याचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
10 ऑगस्टपासून गट आरक्षण
गणेशोत्सवासाठी 10 ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. किमान 40 प्रवाशांचा गट असल्यास ही सुविधा उपलब्ध होईल. गट आरक्षण करणार्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के भाडे सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के भाडे सवलत देण्यात येणार आहे.

COMMENTS