अर्धापूर : मालेगाव शहरात चोरी आणि फसवणुकीच्या घटनांनी डोके वर काढले असून भरदिवसा घडणार्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले

अर्धापूर : मालेगाव शहरात चोरी आणि फसवणुकीच्या घटनांनी डोके वर काढले असून भरदिवसा घडणार्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला सराफा व्यापार्याची लाखोंची बॅग लंपास करण्यात आली, तर दुसरीकडे तोतया पोलिसांनी वृद्धाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास शिवशक्ती ज्वेलर्सचे मालक सचिन उडानशिव हे दुकान उघडून मंदिरात गेले होते. यावेळी त्यांच्या वडिलांनी दुकानात सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग ठेवून साफसफाई सुरू केली होती. याच संधीचा फायदा घेत पाळत ठेवून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी ही बॅग लंपास केली. या बॅगेत अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांचे दागिने होते. चोरीनंतर चोरटे दुचाकीवरून वसमत मार्गे पळून गेले. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी चित्रपटातील पाठलागासारखी धाव घेत चोरट्यांचा पाठलाग केला; मात्र चोरट्यांनी चकवा देत पसार होण्यात यश मिळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व निरीक्षक कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शहरात तोतया पोलिसांच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. आठ दिवसांपूर्वी बालाजी मंदिरातून दर्शन घेऊन परतणार्या 70 वर्षीय हिरामण इंगोले यांना चोरट्यांनी लक्ष्य केले. आम्ही पोलीस आहोत, शहरात चोरी वाढली आहे, तुमची अंगठी काढून सुरक्षित ठेवा, असे सांगून चोरट्यांनी हातचलाखीने त्यांच्या सुमारे 5 ग्रॅम वजनाच्या (अंदाजे 70 हजार रुपये किमतीच्या) सोन्याच्या अंगठीवर डल्ला मारला. नकली अंगठी असलेली पुडी देऊन आरोपी फरार झाले. या सलग घटनांमुळे व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS