कोपरगाव : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय नौदलात अधिकारी पदापर्यंत मजल मारत संजीवनी

कोपरगाव : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय नौदलात अधिकारी पदापर्यंत मजल मारत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आकांक्षा विक्रम भास्कर हिची भारतीय नौदलात उपलेफ्टनंट (Sub Lieutenant) पदावर निवड झाली आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल संजीवनी समूह संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांनी आकांक्षा भास्कर तसेच तिचे वडील विक्रम भास्कर आणि आई अर्चना भास्कर यांचा विशेष सत्कार करून गौरव केला.
संजीवनी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आजवर देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. मात्र, आता संरक्षण आणि राष्ट्रसेवेच्या क्षेत्रातही संस्थेचे विद्यार्थी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे आकांक्षाच्या निवडीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी आकांक्षा व तिच्या पालकांचे कौतुक केले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. राजेंद्र कापगते, विभागप्रमुख डॉ. प्रसाद पटारे आदी मान्यवर उपस्थित होते.
आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले: सत्काराला उत्तर देताना आकांक्षा भास्कर भावूक होत म्हणाली, “मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. आपल्या लेकीने सैन्यदलात जाऊन देशसेवा करावी, असे माझ्या आई-वडिलांचे स्वप्न होते, आज ते स्वप्न पूर्ण करू शकले याचा मला सार्थ अभिमान वाटतो.”
व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “आकांक्षाने मिळवलेले यश संजीवनी परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील मुलींमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची अफाट क्षमता आहे, याचे आकांक्षा हे उत्तम आणि प्रेरणादायी उदाहरण आहे.”

COMMENTS