संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेतून निळवंडे धरण सुरू झाले. या धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनेकांनी अडचणी निर्माण करण्य

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेतून निळवंडे धरण सुरू झाले. या धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनेकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही धरण आणि दोन्ही कालवे आपण पूर्ण केले. आता पाणी आले आहे आणि उर्वरित भागालाही ते द्यायचे आहे. मात्र, कॉंक्रिटीकरण (अस्तरीकरण) करून पाणी पुढे नेले जात असून संगमनेर तालुक्याला आपल्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
तळेगाव दिघे येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक जगताप, डॉ. समाधान सुरवसे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, रामहरी कातोरे, प्रभाकर कांदळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, नदीच्या पुढील भागातील शेतकरीही आमचेच आहेत, मात्र आपल्या हक्कावर गदा येता कामा नये. पाणी आणि वीज या राजकारणापलीकडच्या गोष्टी आहेत. याबाबत नवीन लोकप्रतिनिधी काहीही बोलत नाहीत, हे दुर्दैवी आहे.
एकरी १०० टन ऊस उत्पादित करा दूध व ऊस हे या भागातील शाश्वत पीक आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी शंभर टन उत्पादन घ्यावे, असे आवाहन थोरात यांनी केले. याचबरोबर चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड महामार्ग या भागातून जात असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा याकरता आपण पाठीशी आहोत. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS