बीड : बीड जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग अधिकार्याला धमकी देऊन शासकीय कामासाठी दबाव आणल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील दोषी ग्रामसेव

बीड : बीड जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग अधिकार्याला धमकी देऊन शासकीय कामासाठी दबाव आणल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील दोषी ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकार्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) दिव्यांग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश धर्मराज माने यांनी केली आहे.
याबाबत माने यांनी १५ जून रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांना निवेदन दिले. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
निवेदनानुसार, बीड जिल्हा परिषद प्राथमिक विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी (अतिरिक्त कार्यभार पंचायत विभाग) राजेंद्र श्रीरंग ओव्हाळ हे दिव्यांग अधिकारी आहेत. २६ मे २०२६ रोजी ग्रामपंचायत धोत्रा (ता. केज) येथील ग्रामसेवक सखाराम विठ्ठल काशिद यांनी प्रशासकीय नियम डावलून फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी ओव्हाळ यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमाप्रमाणे स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर ग्रामसेवकाने आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी दिल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. “तुला बघून घेतो, तू सह्या केल्या कशा नाही?” अशा प्रकारची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) किशोर काळे यांना देण्यात आली होती. मात्र, त्यांनी दोषी ग्रामसेवकाची बाजू घेतल्याचा आरोप आरपीआय दिव्यांग आघाडीने केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आरपीआय दिव्यांग आघाडीच्या प्रमुख मागण्या :
- धमकी देणार्या ग्रामसेवक सखाराम विठ्ठल काशिद यांना तात्काळ निलंबित करावे.
- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.
- ग्रामसेवकाला पाठीशी घालणार्या अधिकार्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करावी.
प्रशासकीय व्यवस्थेत काम करणार्या दिव्यांग अधिकार्याचा अपमान आणि मानसिक छळ कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. प्रशासनाने दोषींवर तात्काळ कारवाई केली नाही तर आरपीआय दिव्यांग आघाडी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा सुरेश माने यांनी दिला.

COMMENTS