संगमनेर : जगात पद दलित आणि शोषितांच्या न्यायासाठी होणाऱ्या प्रत्येक क्रांतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे

संगमनेर : जगात पद दलित आणि शोषितांच्या न्यायासाठी होणाऱ्या प्रत्येक क्रांतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवास्पद असणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले समतेचे आणि मानवतेचे विचार हे जगातील प्रत्येकासाठी सदैव प्रेरणादायी असून त्यांनी दिलेली राज्यघटना देशाला एकसंघ ठेवण्यासाठी जपा असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ.आंबेडकर पुतळा येथे अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. तांबे, डॉ.जयश्री थोरात, सुधाकरराव रोहम, उत्कर्षा रूपवते, यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, देशामध्ये सध्या राज्यघटना धोक्यात आली असून न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ईडी यासारख्या संस्था स्वायत्त आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. राज्यघटनेला जर कोणी पायदळी तुडवणार असेल तर सर्वांनी सक्षमपणे राज्यघटनेच्या विचारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
तर आ. तांबे म्हणाले की, मागील 40 वर्षापासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. थोरात,तांबे परिवार हा कायम लोकशाही मानणारा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जोपासणारा आहे. आणि यापुढेही हाच विचार जोपासला जाईल असे ते म्हणाले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सुरुवात घरापासून करा. घरात विचार आले तर देशात येतील असे आमदार तांबे म्हणाले.

COMMENTS