अहिल्यानगर : राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता विविध हवामान तज्ज्ञ, अभ्यासक आणि संस्थांकडून व्यक्त केली जात असताना, संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सा

अहिल्यानगर : राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता विविध हवामान तज्ज्ञ, अभ्यासक आणि संस्थांकडून व्यक्त केली जात असताना, संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करून कृत्रिम पर्जन्यनिर्मितीचा (Cloud Seeding) कार्यक्रम राबवावा, अशी मागणी भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात भद्रे यांनी म्हटले आहे की, जून महिन्याचा मध्य जवळ आला असतानाही अनेक भागांत पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने सन २००५ मध्ये बंद करण्यात आलेला ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याचा विचार करावा.
कृत्रिम पर्जन्यनिर्मिती प्रकल्पासाठी काही कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असला, तरी दुष्काळ पडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि जलटंचाई निवारण उपाययोजनांवर शासनाला शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा प्रकल्प अधिक परिणामकारक आणि किफायतशीर ठरू शकतो, असे भद्रे यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने आवश्यक रडार व्यवस्था, विमाने आणि हवामान निरीक्षण यंत्रणा उपलब्ध करून ‘प्रकल्प वर्षा’ तातडीने पुनरुज्जीवित करावा, अशी मागणी भारतीय जनसंसदेचे राज्य निमंत्रक अशोक सब्बन, सरपंच कैलास पठारे, अशोक ढगे, वीरबहादूर प्रजापती, सुनील टाक, भगवान जगताप, भोसले, पोपटराव साठे आणि जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

COMMENTS