मुंबई: यंदा उशिराने दाखल झालेला नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आता संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. पुढील ४८ तासांत राज्यात पावसाचा वेग आणखी वा

मुंबई: यंदा उशिराने दाखल झालेला नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आता संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. पुढील ४८ तासांत राज्यात पावसाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील विविध भागांसाठी २७ जूनपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाले होते. मात्र, आता वातावरणीय स्थिती अनुकूल झाल्याने पावसाचा विस्तार आणि तीव्रता वाढते आहे. पश्चिमेकडील वारे खालच्या वातावरणीय स्तरावर अधिक सक्रिय झाले असून, सोमालिया किनारपट्टीनजीक कमी दाबाशी संबंधित वायुप्रवाह प्रभावी झाल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आर्द्रता पोहोचत आहे. यामुळे पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वाढली आहे. लवकरच हा पाऊस गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागांतही विस्तारणार आहे.
उत्तर कोकणातील अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही बहुतांश ठिकाणी मुसळधार सरी कोसळू शकतात. नदी-नाल्यांलगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे. मराठवाड्यातील काही भागांत अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासोबतच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खडकवासला तसेच इतर धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने जलसाठ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई आणि कोकणात दिलासा, पेरणीच्या कामांना वेग

मुंबई, वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात मागील मुसळधार पाऊसानंतर काही प्रमाणात परिस्थिती सुधारली असून पाणी ओसरले आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत झाली असली तरी पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता कायम आहे. कोकण विभागात पावसामुळे भातलावणीच्या कामांना गती मिळाली आहे. काही भागांत मात्र अद्याप अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना उपलब्ध जलस्रोतांचा वापर करून शेतीची तयारी करावी लागत आहे. उशिरा आलेल्या मोसमी पावसाने आता संपूर्ण राज्य व्यापल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS