Homeताज्या बातम्या

सुरत-चेन्नई महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला द्या : खा. निलेश लंके यांची नितीन गडकरींकडे मागणी

अहिल्यानगर : जिल्ह्यातील सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय्य मोबदला मिळावा तसेच नगर तालुक्यातील चिचोंड

शिष्यवृत्ती परीक्षेत महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचे यश; ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक!
सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा बीडमध्ये निषेध; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
संगमनेरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात; डॉ. मैथिली तांबे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप व दर्शन

अहिल्यानगर : जिल्ह्यातील सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय्य मोबदला मिळावा तसेच नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरातील सुमारे १ हजार एकर शासकीय जमिनीवर लॉजिस्टिक पार्क अथवा एमआयडीसीच्या धर्तीवर औद्योगिक प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार डॉ. निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर महामार्गाची नोंद झाली असून त्यामुळे कर्जप्रकरणे, जमीन खरेदी-विक्री, वाटणी तसेच इतर आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक बाधित शेतकऱ्यांना अद्यापही योग्य मोबदला मिळालेला नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनींसह घरे, विहिरी, गोठे, झाडे व इतर स्थावर मालमत्तेचे पारदर्शक पद्धतीने योग्य मूल्यांकन करून त्यांना तातडीने न्याय्य मोबदला देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याशिवाय नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरातील सुमारे १,००० एकर शासकीय जमीन औद्योगिक विकासासाठी वापरून तेथे लॉजिस्टिक पार्क किंवा एमआयडीसीच्या धर्तीवर औद्योगिक प्रकल्प उभारल्यास मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होईल असेही लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, नगर–मनमाड रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याबद्दलही त्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून वारंवार अपघात होत असल्याने संबंधित यंत्रणेला निर्देश देऊन हे काम दर्जेदार व जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. या तिन्ही विषयांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती खा. लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

COMMENTS