नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे राजकीय रणांगण आता निर्णायक टप्प्यात पोहोचले असून, महायुतीतील नाराजीच

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे राजकीय रणांगण आता निर्णायक टप्प्यात पोहोचले असून, महायुतीतील नाराजीच्या चर्चांपेक्षा पक्षशिस्त आणि सत्तेची राजकीय गरज अधिक प्रभावी ठरणार असल्याचे चित्र समोर येत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून काही मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चा रंगत असल्या, तरी अंतिम क्षणी सर्वांना अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठीच मैदानात उतरावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महायुतीने भाजपचे अमरनाथ राजूरकर यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे आता ही निवडणूक केवळ एका उमेदवाराच्या विजयापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर महायुतीतील अंतर्गत समन्वय, नेतृत्वाचा प्रभाव आणि घटक पक्षांची निष्ठा यांचीही परीक्षा मानली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले. एकूण आठ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले असून छाननीत सर्व अर्ज वैध ठरले आहेत. ४ जून हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने अनेक राजकीय समीकरणे अजूनही पडद्यामागे आकार घेत आहेत.
दरम्यान, महायुतीतील काही नेत्यांनी उमेदवारी प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, अशा नाराजीला फारसे महत्त्व देण्यास महायुतीतील वरिष्ठ नेते तयार नाहीत. विधान परिषदेसारख्या अप्रत्यक्ष निवडणुकीत पक्षाचा आदेश आणि संघटनात्मक शिस्त यांना प्राधान्य द्यावे लागते. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतलेल्या बैठका आणि दिलेले राजकीय संकेत महत्त्वाचे मानले जात आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा संदेश या बैठकींमधून दिला जात आहे. १८ जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी नाराजांचे सूर कितीही ऐकू आले, तरी शेवटचा शब्द पक्षनिष्ठेचाच राहतो की राजकीय बंडखोरीचा, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS